वेशांतर करून रचला सापळा! उत्तराखंडमधून तिघांना आणले सातारा, भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांची उत्कृष्ठ कामगीरी

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
सातारा : सातारा जिल्हा पाेलीस दलानं उत्तराखंडमधून तिघा युवकांना चाेरी प्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई भुईंज पोलिस आणि सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. या कारवाईत तिघांकडून तब्बल १७५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईबाबत पाेलीसांनी दिलेली माहिती अशी की १२ ऑगस्टला संध्याकाळी (कवठे ता. वाई) गावचे हद्दित एका हाॅटेल येथे शिवशाही बस थांबली हाेती. या बसमधील प्रवाशाच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीस गेले. त्यानंतर प्रवाशाने भुईंज पोलीस ठाणे येथे तक्रार नाेंदवली. भुईंज पोलिस आणि सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी या गुन्हयाचा तपास करुन केवळ तांत्रिक माहितीचे आधारावर संशयितांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणातील संशयित हे उत्तराखंड येथे असल्याचे पाेलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी संशयितांना जेरबंद करण्यासाठी प्लॅन केला. त्यानंतर एक पथक उत्तराखंडमध्ये गेले. वेशांतर करुन संशयितांचा माग काढला. अगदी एखाद्या सिनेमातील कथानकाप्रमाणेच भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी या प्रकरणाचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही संशयितांना उत्तराखंडहून ताब्यात घेतल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महीपाल रामगोपाळ सिंग वय ४० (सध्या राहणार रामविहार कॉलनी, बी ३२, डेहराडून, राज्य -उत्तराखंड, मुळ रा.रावली ता.जि. बिजनौर, उत्तरप्रदेश), वीरबहादुर रमेश सिंग (वय ४२ खंजाहानपूर, बाकारपुर गढी ता. बिजनौर, जि. बिजनौर, उत्तरप्रदेश) , महेश कुमार दयाराम सिंग (वय ३७, रामपूर बकली, ता.जि. बिजनौर, उत्तरप्रदेश) अशी संशयित आराेपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १७५ ग्रॅम चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.



