मुंबईतून गुजराती, राजस्थानी काढल्यास काही पैसाच उरणार नाही, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच मोठ विधान

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि गेल्या अडीच वर्षातलं ठाकरे सरकार यांच्यातला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. विविध मुद्द्यांवर राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावरती अनेकदा टीका झाली आहे. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ही राज्यपालांवरती अनेकदा टीकेचे बांध सोडले गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली बारा आमदारांची यादी असो, किंवा विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवड असो, हे सर्व मुद्दे गेल्या सरकारच्या काळात चांगलेच गाजले आहेत. तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तर राज्यपालांवर राज ठाकरे यांच्यासहित सर्वांनी टीकेची झोड उडवली होती. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी हे पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानाने चर्चेत आले आहेत.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या राज्यपालांनी या वेळेस थेट मुंबई बाबत एक मोठं विधान केला आहे. मुंबईत बाहेरून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काम धंदा, व्यवसाय करण्यासाठी तसेच नाव कमावण्यासाठी अनेक जण स्वप्नाची नगरी मुंबईमध्ये येतात आणि मुंबईत आपली स्वप्नं पूर्ण करतात, म्हणूनच मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. मात्र राज्यपालांनी यावेळी बोलताना, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं थेट विधान केलं आहे. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता
त्यामुळे याही विधानाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. तसेच यावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया ही उमटण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या राजकारणात मुंबईला एका अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अनेक योध्यांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. त्यानंतर ही मुंबई मोठ्या संघर्षातून महाराष्ट्राला मिळाली आहे. अलीकडचा राजकीय संघर्ष पाहता भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, असा आरोप महाविकास आघाडी कडून सतत होतो. तसेच अलीकडे उद्धव ठाकरे यांनी हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे. भाजपला संपूर्ण देश मिळाला आहे तरी जसा रावणाचा जीव हा बेंबीत होता, तसा भाजप नेत्यांचा जीव हा मुंबईत अडकलाय असी टीका केलेली आहे. त्यातच आता राज्यपालांचं हे विधानाने या राजकारणाला आणखी फोडणी पडण्याची शक्यता आहे.



