बापरे! शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल!” एकदम कसं ओके मधी.

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी विस्तार झााला होता त्यानंतर आज खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. आधी मंत्रीमंडळ विस्ताराला तब्बल दिड महिना उशीर झाल्याने विरोधकांकडून टीका करण्यात आली होती, त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली.अखेर आज राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर केले असून, फडणवीसांकडे महत्वाची खाती देण्यात आली आहेत. या खातेवाटपानंतर कॉंग्रेकडून टीका करण्यात आली आहे.
खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत.
फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली..
शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी , डोंगर आणि हॉटेल ! #MaharashtraCabinet— Nana Patole (@NANA_PATOLE) August 14, 2022
मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे आहेत, यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केलं असून “फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली.. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल!”, असं खोचक ट्वीट त्यांनी केलं आहे.
राज्य मंत्रिमंडळात राधाकृष्णविखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्यमंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे. विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी मंत्रालयाची, गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राजसह वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर दादा भुसे यांना बंधारे व खणीकर्म सोपविण्यात आलं आहे. तर संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलं. तर सुरेश खाडे यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली असून उदय सावंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला व बालविकास खात्याचा भार.




