महाराष्ट्रराजकारण

मंत्रालयात जाताय? मग पाण्याची बाटली नेता येणार नाही! मंत्रालयामध्ये पाणी बॉटलवर बंदी

मुंबई : मुंबईत अनेकदा मंत्रालयात वेगवेगळ्या कामासाठी राज्यभरातून लोक येत असतात.
त्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे मंत्रालयामध्ये पाण्याची बाटली घेऊन जाता येणार नाही. मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भेटीगाठींसाठी येणाऱ्यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची बाटली ठेवून आत जावं लागेल. मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्याचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वेग आलेला असतानाच नव्या सरकारकडून कामंही सुरु झाली आहे. तीन कॅबिनेट बैठकाही झाल्या. काही महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले गेले. त्यात आता पाण्याच्या बाटलीवर बंदीचाही आदेश घेण्यात आलाय.


आत्महत्यांची धास्ती?


अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचेही प्रयत्न झाले आहेत. काही जण पाण्याच्या बाटलीतून रॉकेल किंवा कीटकनाशक अन्यथा एखादं रसायन घेऊनही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठीही पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.


गुटखाबंदी, पण भिंती बरबटलेल्या…


दुसरीकडे मंत्रालयात गुटखाबंदी आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भेटीगाठींसाठी येणाऱ्यांच्या बॅग आणि खिशांची तपासणी होते. पान तंबाखूच्या पुड्या गेटवर काढून घेतल्या जातात. पण तरिही अनेकजण छुप्या मार्गाने तंबाखूच्या पुड्या मंत्रालयात घेऊन जात असल्याचंही दिसून आलंय. मंत्रालयातील स्वच्छतागृहात गुटखा खाऊन थुंकल्यानं बेसिन तुंबल्याचे प्रक्रार समोर आलेले होते.


आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जनता मंत्रालयात येत असते. याआधीही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते. मध्यंतरीही मंत्रालयात विष प्रशान करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आता खबरदारी घेतली जाते आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिण्याच्या पाण्याची पिंपं भरुन ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra