अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरलं, शिंदे गटाकडून पाच जणांना फोन, वाचा कोणाला मिळणार संधी?

मुंबई : सत्ता स्थापन होऊन ३७ दिवस उलटले तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता. यावरुन विरोधकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होत असताना अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचे मुहूर्त ठरले आहे. ९ ऑगस्ट रोजी हा विस्तार होणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची उत्सुकचा शिघेला पोहचली असताना भाजप पाठोपाठ शिंदे गटाकडूनही पाच जणांना फोन गेला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ आणि संदिपान घुमरे यांना फोन गेल्याचे समजत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून मार्गी लागणार असे चित्र आहे.
विरोधकांच्या टिकेनंतर मुहूर्त ठरला
शिंदे सरकराची स्थापना होऊन देखील राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच पाहत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न रखडलेले असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लावून धरला होता. राज्यात होत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे पिकांचे नुकसान याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मंत्री आणि पालकमंत्री असल्यावर हे प्रश्न लागलीच निकाली असते अशी टिका सातत्याने शिंदे सरकारवर होत होती. शिवाय शिंदे सरकारकडून केवळ तारिख पे तारिख दिली जात होती. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारीहून परतल्यानंतर अखेर विस्ताराला मुहूर्त लागले असून मंगळवारी शिंदे गटाचे काही आणि भाजपाचे काही आमदार हे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
या आमदारांची लागणार वर्णी..!
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आतापर्यंत केवळ चर्चा होत होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाकडून राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, सुधाीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांना फोन करण्यात आला आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ आणि संदिपान घुमरे यांना फोन गेल्याचे समजत आहे. त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या निश्चित होणार आहे.



