जालन्यातील आयकर विभागाच्या धाडीचे औरंगाबाद कनेक्शन? बघा काय आहे प्रकरण
जालना येथील स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. त्याची लिंक आता औरंगाबादमध्ये जोडली जात आहे. व्यवसायात कमवत असलेला काळा पैसा एका केटरर्सद्वारे वैध करण्याचे काम केले जाते, असा संशय व्यक्त केला जातोय.

औरंगाबाद – जालना येथील स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्याची लिंक आता औरंगाबादमध्ये जोडली जात आहे. व्यवसायात कमवत असलेला काळा पैसा एका केटरर्सद्वारे वैध करण्याचे काम केले जाते, असा संशय व्यक्त केला जातोय. तर, संशय असलेल्या केटरर्सवर दीड वर्षा आधाी देखील कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आताच्या कारवाईच्या जुन्या कारवाई सोबत काही संबंध तर नाही ना? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
जालन्यात आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त केला आहे. यावेळी आयकर विभागाकडून छापासत्र टाकताना अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वाहनांना विवाहाचे बॅनर वाहनांवर लावून छापासत्र सुरू केलं. त्यांनी आपल्या वाहनांवर राहुल अंजली वेड्स असे स्टिकर लावल्याचे दिसून आले.
या कारवाईत औरंगाबादमधील जमीन व्यावसायिक आणि केटरर्स व्यापाऱ्याचाही समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. व्यवसायात हिशोबत न दाखवलेली अवैध संपत्ती वैध करण्याचे काम केले जात असल्याचा संशय आहे. त्याच अनुषंगाने औरंगाबादमध्ये देखील तपास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जालन्यात सलग तिसऱ्या दिवशी छापासत्र सुरू राहिले. स्टील उद्योजकांच्या घरासह कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहेत. शहरातील कापड, इलेक्ट्रॉनिक्स सामानाच्या दुकानांवर शहरातील काही बँकेवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. जिंदल मार्केटमध्ये देखील काही दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी जप्त केली कागदपत्रे – दुकानांमधून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, अधिकारी स्तरावर कोणतीही अजून माहिती दिलेली नाही. या कार्यवाहीत मोठ्या प्रमाणात अधिकारी आसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारवाईत जालना औरंगाबाद येथील प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
छाप्यात ३९० कोटींची मालमत्ता जप्त – प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत ५८ कोटींची रोख रक्कम, ३२ किलो सोने अशी एकूण ३९० कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे. आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्तेवर मागील ६ दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते. या छापेमारीतच काही दस्तावेज ३२ किलो सोने, ५८ कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.



