मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात केले ध्वजारोहण, पहा मंत्रालयातील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा संपूर्ण व्हिडियो

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
मुंबई : राज्य सरकार हे राज्यातील गरिब व दुर्बल घटकांच्या विकासासाठी झटत असून राज्याला गतिमान प्रशासन आणि विकासाला आणखी चालना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.
देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण केल्यानंतर राज्याच्या जनतेला संबोधित केलं आहे. यात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोणत्या योजनांवर तथा कोणत्या विकासकामांवर जोर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळं राज्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिपांकर दत्ता, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबई महापालिका आयुक्त ईक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.




