गुन्हे

जालना येथील समर्थ रामदासांच्या जांब येथील राम मंदिरातील चोरीचे विधानसभेत पडसाद, राजेश टोपेंच्या मुद्द्यावर, फडणवीसांचं आश्वासन काय?

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

जालना : जालना येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या जन्मगावी म्हणजेच जांब समर्थ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याची मोठी घटना घडली.याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मूर्ती चोरल्या. समर्थ रामदास स्वामी यांनी प्रतिष्ठापना केलेल्या राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती काल रात्री चोरीला गेली. रविवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास ही चोरी झाल्याचे उघडकीस आले. यासंदर्भातील मुद्दा जालना विधानसभेचे आमदार राजेश टोपे यांनी आज अधिवेशनात उपस्थित केला. सदर घटनेमुळे जनमानसात रोष आहे. या प्रकरणी गांभीर्यानं कारवाई होण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे जांब आणि जालना परिसरात खळबळ माजली आहे. राज्यभरातून जांब येथे दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे ही बातमी ऐकून भाविकांमध्येही नाराजीचं वातावरण आहे.

(जांब समर्थ मंदिरातील याच मूर्ती चोरीला गेल्या आहेत)

चोरीची घटना काय?
जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हे गाव आहे. येथील रामदास स्वामी यांच्या प्राचीन घरात राम मंदिर आहे. रामदास स्वामी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे मंदिर बनवण्यात आले आहे. याच मंदिरातील पंचायतन म्हणजेच राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रूघ्न हे पंचायत चोरीला गेले आहे. तसेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्तीही चोरट्यांनी पळवून नेली आहे. एवढंच नाही तर रामदास स्वामींच्या झोळीत नेहमीच एक मारुतीची मूर्ती असायची, तीदेखील चोरट्यांनी पळवली. ही घटना घडल्यानंतर जालन्यात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

देवेंद्र फडणीवसांचं आश्वासन काय ?
जालना येथील घटनेचा मुद्दा आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत उपस्थित केला. पहाटे ३ वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मूर्ती चोरल्याने लोकांमध्ये रोष आहे. राज्यभरातून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, याबद्दल मला सकाळीच माहिती कळाली. यासंदर्भात मी पोलिस महासंचालकांशी बोललो आहे. संपूर्ण ताकद लावून या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच आरोपींना पकडून मूर्ती परत आणून द्याव्यात असे आदेश दिले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra