भाजपकडून गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेसची सोय

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
मुंबई : कोकणवासीयांसाठी पुन्हा मोदी एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
आज रविवारी, 28 ऑगस्ट रोजी ही एक्सप्रेस चाकरमान्यांना घेऊन जाईल. मुंबई भाजपकडून कोकणवासीयांसाठी ही विशेष व्यवस्था करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षीही गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेने कोकणवासीयांना गणपती उत्सवापूर्वीच सुखरुप पोहचवले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेचा चाकरमान्यांना विशेष फायदा झाला. तर कोकणापर्यंत चाकरमान्यांना सहज जाता यावे यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे आणि खासगी वाहनांची विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ताण येणार नाही आणि गणेशभक्त सुखरुप गावी पोहचणार आहेत.
पंतप्रधानांच्या नावे विशेष गाडी
मुंबईकरांना कोकणात गणेशोत्सवासाठी सुरक्षित आणि वेळेत जाण्यासाठी ही विशेष रेल्वे सोडण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी एक्सप्रेस सोडण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. २८ ऑगस्टसाठी ही विशेष गाडी सावंतवाडीसाठी सुटेल. मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येत आहे.
येथे थांबेल मोदी एक्स्प्रेस
मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सावंतवाडीपर्यंत जाणार आहे.ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर थांबेल. या गाडीचा सर्व खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे. या विशेष रेल्वेसाठी मुंबईतील प्रत्येक मंडळामधून ५० प्रवाशांची नावे नोंदवण्यात आली आहेत. जिल्हाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर ही नावे नोंदवण्यात आली आहे. प्रत्येकाला १०० नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. कोकणातील चाकरमान्यांना गौर-गणपतीचा सण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी ही विशेष गाडी सोडण्यात येत आहे.
प्रवाशांनी मानले आभार
दरम्यान मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेसंदर्भात आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात प्रवाशांनी मोदी एक्सप्रेसच्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या लुटीला चाप बसला आहे. प्रवाशांचे प्रत्येकी १००० ते १२०० रुपये वाचल्याची प्रतिक्रिया प्रवाशाने दिली आहे.
#modiexpress @BJP4Maharashtra pic.twitter.com/lelyPDbbDB
— nitesh rane (@NiteshNRane) August 28, 2022
रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या
कोरोनानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील कोकणवासीयांमध्ये गावी जाण्याची लगबग उडाली आहे. होणारी तोबा गर्दी पाहता, रेल्वेकडून ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे बुकिंग यापूर्वीच झाले आहे. या गाड्या फुल झाल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली होती. यातील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. उर्वरित रेल्वेगाड्या नागपूर, पुण्यावरून सुटणार आहेत. आता रेल्वेने ३२ अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.



