राष्ट्रीय

हैदराबाद मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सव; तेलंगणा सरकारकडून अमृतमहोत्सव कार्यक्रमाचं आयोजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार

हैदराबाद मुक्ती दिन”ला यंदा ७५ वर्ष होत आहेत. त्यामुळे तेलंगणा सरकारकडून अमृतमहोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर कार्यक्रम चालणार आहे. याला केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने परवानगीही दिली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. “हैदराबाद मुक्ती दिन” च्या स्मृतीप्रित्यर्थ १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर, २०२३ पर्यंत वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हैदराबाद येथील परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात येणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, सांस्कृतीक मंत्री गंगापुरम किशन रेड्डी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सांस्कृतिक मंत्रालय १७ सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद मुक्ति दिनाच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेतील उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करेल. सांस्कृतिक मंत्रालयाने तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हैदराबाद येथील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. ज्यांनी हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी आणि भारतात विलीनीकरणासाठी आपल्या प्राणांची अहुतू दिली त्या सर्वांना वाहणे हे या कार्यक्रमांमागचे उद्दिष्ट आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाला ७५ वर्षे पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने यासंबधित वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करणाची विनंती करतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यासंबंधी एकत्र येत समग्र दृष्टीकोन समोर ठेऊन सामायिक कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असे किशन रेड्डी म्हणाले. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवाचं महत्व सागंताना ते म्हणाले की, हैदराबादच्या इतिहासावर प्रकाश टाकणे महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीला हैदराबाद मुक्तीसंग्रामातील प्रतिकार, शौर्य आणि बलिदान या गोष्टींची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे. हा कार्यक्रम अधिक मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं अशी मी विनंती करतो. भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाहून अधिक काळानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी, हैदराबाद राज्याला निजामाच्या राजवटीपासून मुक्ती मिळाली होती. भारतीय स्वातंत्र्यानंतर हा लढा अधिक तीव्र झाला. वंदे मातरमचा जयघोष करणार्‍या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्याच्या मागणीमुळे या लढ्याचे रूपांतर मोठ्या जनआंदोलनात झाले होते. ऑपरेशन पोलो अंतर्गत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्वरित केलेल्या कारवाईमुळे हैदराबाद मुक्ती शक्य झाली होती. निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद राज्यात संपूर्ण तेलंगण, महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेश ज्यामध्ये औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि सध्याच्या कर्नाटकातील कलबुर्गी, बेल्लारी रायचूर, यादगीर, कोप्पल, विजयनगर आणि बिदर या जिल्ह्यांचा समावेश होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकार अधिकृतपणे १७ सप्टेंबर हा दिवस, मुक्ती दिन म्हणून पाळतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra