अखेर ७ दिवसांनंतर कैलास पाटील यांचे उपोषण मागे, फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतर घेतला निर्णय

✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे
उस्मानाबाद, 30 ऑक्टोबर : राज्य सरकार आणि विमा कंपन्यांकडील थकीत अनुदान मिळावे यासाठी गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करणारे आमदार कैलाश पाटील यांनी अखेरीस उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी निर्णय घेतला. कैलाश पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता. राज्य सरकार आणि विमा कंपन्यांकडील थकीत अनुदान मिळावे अशी प्रमुख मागणी आमदार कैलास पाटील लावून धरली होती. गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण आंदोलन करत असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाटील यांना फोन करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पैसे येत नाहीत तो पर्यंत मी माघार घेणार नसल्याची भूमिका पाटील यांनी घेतली आहे.
आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कैलास पाटील यांची भेट घेतली. यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे उपोषण स्थळी उपस्थिती होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाटील यांची फोनवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, अंबादास दानवे यांनीच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना फोन लावला होता.
आमदार कैलाश पाटील यांच्याशी फडणवीस यांनी संवाद साधला आणि आश्वासन दिलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्याशीही कैलाश पाटील यांच्यासोबत फोन वर चर्चा झाली. उध्दव ठाकरे यांनी कैलाश पाटील यांना उपोषण मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर कैलाश पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, नारळ पाणी पिऊन पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं.




