महाराष्ट्रसामाजिक

‘सायबर युनिट’ अधिक सक्षम करुन, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांचे दैनंदिन आर्थिक, व्यावसायिक व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ व सोशल मीडियाचा वाढता वापरामुळे सायबर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. अशी लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी उपस्थित केली होती.

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

मुंबई : राज्यात ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यासाठी राज्य पोलीस दलाच्या सायबर युनिटमधील यंत्रणा अद्ययावत आणि प्रशिक्षित आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या क्षेत्रातील खासगी तज्ज्ञ कंपन्यांच्या सेवा घेवून सायबर युनिट अधिक सक्षम करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन आर्थिक, व्यावसायिक व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ व सोशल मीडियाचा वाढता वापरामुळे सायबर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. अशी लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी उपस्थित केली होती.

सायबर दलातील कर्मचाऱ्यांसाठी जागा नाही, अद्ययावत कंप्युटर सुविधा नाही, त्यांना ट्रेनिंगही दिले जात नाही त्यामुळे गुन्हेगार १० पावले पुढे आहेत. असेही कायंदे यांनी सांगितले. त्यावर या गुन्ह्यांना भौगोलिक कक्षा नसल्याने हे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर आहे. गुन्हेगार नवनवीन तंत्राचा वापर करतात. त्यांना रोखण्यासाठी राज्याचे सायबर युनिट सक्षम आहे. तथापि, बदलत्या तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांचीही मदत घेतली जाईल. अशी माहिती गृहमंत्री फडणवीस यांनी दिली.

सायबर विभागाची व्याप्ती वाढविणार
वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी या विभागाची व्याप्ती वाढविणार आहोत. त्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत. तसेच आत्याधुनिक यंत्रणाही वापरण्यात येत आहेत. ३४ सायबर आणि फॉरेन्सिक लॅबही उभारण्यात आल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. नेपाळ आणि अन्य काही देशातून हे सायबर चोर त्यांचे जाळे चालवत असल्याचेही त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या क्षेत्रातील खासगी तज्ज्ञ कंपन्यांच्या सेवा घेवून सायबर युनिट अधिक सक्षम करण्यात येईल.
सायबर गुप्तचर यंत्रणा उभारणार
सोशल मिडिया, ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रामण वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील सायबर शाखेत गुप्तचर यंत्रणा तयार करणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार
सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी नागरिकांनी देखील दक्ष राहणे आवश्यक असून यासाठी शासनाबरोबरच सोशल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आदी माध्यमांतून जनजागृती करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. सिनेमा क्षेत्रात होणारी पायरसी रोखण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळांनी तेथे दिली जाणारी माहिती खरी असेल, जेणेकरून त्या माध्यमातून फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra