“शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते” रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी विरोधी पक्षनेते आणि मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फ़ोट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार दोघांनी शिवसेना फोडली, असा गंभीर आरोप यांच्यावर केला होता. शरद पवारांनी संधी पाहून डाव साधला. तर अजित पवार यांचा प्रशासकीय अनुभव प्रचंड आहे, त्याच्या जोरावर त्यांनी देखील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले होत. कदम यांच्या या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले कि, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली आहे. शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा देखील आठवले यांनी राऊत यांच्यावरती आरोप केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली नसती तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकारं आलं असतं असं देखील ते म्हणाले. दरम्यान, रामदास कदम यांच्या आगोदर शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. तसेच बंडखोर आमदारांनी थेट माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली होती. अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप त्यांनी याआधी केला होता. मात्र आता रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पूर्णपणे खळबळ उडाली आहे.



