
रांची : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी झारखंडमधील ३ आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.जामतारा येथील इरफान अन्सारी, खिजरी येथील राजेश कछाप आणि कोळेबिरा येथील नमन विक्षल कोंगडी यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षांनी २४ तासांत ही कारवाई केली आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांना त्यांच्या कारमध्ये नोटांच्या बंडलांसह ताब्यात घेण्यात आले होते.या घटनेचा संबंध झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारच्या पाडावाशी जोडला जात आहे. याप्रकरणी रांचीच्या अरगोरा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राज्यातील हेमंत सोरेन सरकार पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या प्रकरणी दोनवेळा एफआयआर दाखल करण्यात आले आहे. येथे काँग्रेसचे तीन आमदार रोख रकमेसह पकडल्यानंतर पक्षातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपला पैसा-बळ-कारस्थानाच्या जोरावर सत्ता मिळवायची आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हंटले आहे. यावर आता काँग्रेस अध्यक्षांनी तीनही आमदारांना निलंबित केले आहे.



