
(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)
पुणे : एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये सुदैवाने उदय सामंतांना दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. पुण्याच्या कात्रज चौकामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की काय प्रकार घडला?
सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबलेला. यावेळेस इतर २-३गाड्यांमधून २०-२५ जण आले. या हल्लेखोरांनी मला शिवीगाळ केली. यानंतर सामंतांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी या हल्लेखोरांना हटकलं. तेव्हा या हल्लेखोरांनी हॉकी स्टीकने गाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. सामंतावंर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व दरम्यान सिग्नल सुटला. सिग्नल सुटला नाहीतर, माझ्यावरही हल्ला झाला असता, अशी भितीही सामंतांनी व्यक्त केली. सांमंतांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की जिथे हा हल्ला झाला, तिथपासून ५०० मीटर अंतरावर आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा सुरु होती.
उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया
“आमच्या सारख्यांनी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन करतोय. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हल्ला करुन इतर ५० आमदारांमध्ये दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे. पण ५० आमदार कोणत्याही दहशतीला बळी पडणार नाही”, आशी माहिती उदय सामंत यांनी दिली
हा हल्ला म्हणजे नामर्दपणाचं लक्षण
“हा हल्ला म्हणजे नामर्दपणाचं लक्षण आहे. मी स्वत: कोथरुड पोलीस ठाण्यात आलोय. मुख्यमंत्री या प्रकरणात लक्ष ठेवून आहेत. पण ज्यांच्या हातात बेसबॉलच्या स्टीक होत्या, गाड्या कोणाच्या होत्या हे पोलिसांनी शोधून काढायला हवं. अशा धमक्यांना उदय सामंत घाबरणारा नाही”, असंही सामंतांनी नमूद केलं.



