महाराष्ट्र

मंत्री तानाजी सावंत आणि उस्मानबादचे जिल्हाधिकारी यांच्यातील कलह चव्हाट्यावर; वादाचं कारण ठरले ओएसडी!

उस्मानाबाद : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याप्रकरणी खुद्द आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सदरील बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शासनाची प्रतिमा मलीन करणारी आहे व मंत्री आस्थापनेच्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे, असे तक्रारीत नमूद करीत जिल्हाधिकारी यांना योग्य ती समज देण्याची विनंती केली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी यांना दमदाटी केल्याचं प्रकरण मंत्री सावंत यांनी गांभीर्याने घेतलं आहे. १८ ऑगस्टपासून मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार रेड्डी हे काम पाहत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावंत यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सद्यस्थितीमध्ये असलेल्या कामांची व प्रगती अहवाल माहिती मी अधिकारी यांच्याकडून गोळा करीत आहे. हे काम करीत असताना जिल्हाधिकारी यांनी त्यांचे लघुलेखक व स्वीय सहायक डी. एस. कुलकर्णी यांच्या मोबाईल फोनवरून १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता फोन केला. व घेत असलेली माहिती कोणत्या अधिकारात संकलित करीत आहात? याबाबत विचारणा केली. त्यानंतर मंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार मी हे करीत असल्याचे रेड्डी यांनी सांगितल्यावर त्यांनी अर्वाच्छ शब्दात दाब दिला व माहिती गोळा करू नये असे सांगितले. माहिती संकलित केल्यास तुम्ही फौजदारी गुन्ह्यास पात्र रहाल. तसंच शासकीय कामात अढथळा म्हणून गुन्हा दाखल करूअसा दम दिला. व यापुढे कार्यालयाच्या परिसरामध्ये येऊ नये अशी धमकी दिली, असल्याचं रेड्डी यांनी तानाजी सावंत यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. रेड्डी यांनी दिलेल्या पत्रानुसार मंत्री सावंत यांनी मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी रेड्डी यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचं रेड्डी यांनी लेखी कळवलं आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून शासनाची प्रतिमा मलीन करणारी आहे. त्याचबरोबर मंत्री आस्थापनेच्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे. तरी याबाबत योग्य ती समज देण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे केली आहे.

मागच्या काही दिवसात विविध कारणामुळे तानाजी सावंत आहेत चर्चेत

शिंदे गटात गेलेले तानाजी सावंत मागच्या काही दिवसात सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचं पहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल दिलेली प्रतिक्रिया, अधिवेशनात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नामुळे झालेलू कोंडी असो अथवा घर ते कार्यालय आणि कार्यलय ते घर असा जाहीर झालेला दौरा, यामुळे तानाजी सावंत सतत चर्चेत आहेत. अशात त्यांचा ससून रुग्णालयातील अधिकाऱ्याला झापलेला व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या कलहमुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra